मुंबई :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 21 दिवसांकरता म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशात करोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी करोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखरे पंतप्रधान मोदी यांनी भूमिका मांडत करत पडदा दूर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’ करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे. ध्यान देऊन ऐका. आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल,’ असं मोदी यांनी सांगितलं.